Sunday, November 22, 2009

शाळा

इयत्ता पाचवी. आम्ही विद्या मंदिर सोडून हायस्कूलमध्ये गेलो, म्हणजे आता आपण कोणीतरी मोठे झालो असं वाटायला लागलं. काय बदललं होतं ते अजून काहीचं कळलं नव्हतं. तर आम्ही, म्हणजे माझा धाकटा भाऊ, माझ्या शेजारची माझ्याच वयाची आणखी एक मुलगी असे तिघे जण, थोड्या भीतीनं, थोड्या उत्साहात जुने-नवे मित्र-मैत्रिणी भेटणार या आनंदात हायस्कूलमध्ये दाखल झालो. पहिल्या काही दिवसांच्या गोंधळानंतर, मी चांगलीच 'सेट' झाले. आमचं हायस्कूल मुला-मुलींचं असलं, तरी आमचा 'पाचवी अ' वर्ग फक्त मुलींचा होता, कारण आम्हाला माहित नव्हतं, आणि आम्हाला ते जाणूनही घ्यायचं नव्हतं. कारण मुलं नसल्यामुळं आम्हाला हवं तसं आमच्या वर्गात राहता येणार होतं.आम्हा ५२ मुलींचं राज्य.

आम्ही आमच्या वर्गात, आठ तासांच्या वेळापत्रकात चांगलेच रुळलो होतो. मधल्या जेवणाच्या सुट्टीत आम्ही ५२ जणी मिळून जेवायचो. अनेक गोष्टी, ज्या आम्ही घरी बोलू शकत नव्हतो, त्या बोलायचो. कुणी डब्बा आणला नसेल तर प्रत्येकजण एक-दोन घास एका डब्ब्याच्या झाकणात गोळा करून तिला द्यायचो.सगळ्या स्पर्धांमध्ये कुणी ना कुणी भाग घ्यायचं, आणि सगळा वर्ग तिच्या सोबत असायचा. माझ्यासारखीला वेगवेगळे खेळ शिकवले जायचे तर माझ्यासारख्या काहीजणी अनेकींना अभ्यासात मदत करायच्या. पाचवी ब, क आणि ड तल्या मुलींना आमचा हेवा वाटायचा. काही कळत नसल्यामुळे असेल आमच्या असूया नव्हती, अजून.

आम्हाला खरचं काही कळत नव्हतं. एक मुलगी, दिसायला गोरी, थोडी जाड, गोल चेहऱ्याची, आईला मदत म्हणून भाजी विकून शाळेला येणारी, म्हणून आम्ही तिला अभ्यासात नेहमी मदत करायचो. एक दिवस जेवणाच्या वेळी ती रडायला लागली. कारण विचारल्या नंतर ती नाक डोळे पुसत म्हणाली,''ते, मराठीचे ........ सर चांगलं न्हायीती. माझा सारखा हात धरत्यात. मला न्हाय आवडतं.आईला सांगितलं तर ती सराचं डोस्कचं फोडील. कसातरीच हाय त्यो''. खरंतर मला 'कसातरी' म्हणजे कसा हेच कळलं नव्हतं. पण माझी मैत्रीण त्या सरांमूळं रडली हेच माझ्यासाठी काय ते महत्वाच होतं. आमच्यासाठी ही खूप मोठी समस्या होती. सगळ्यांनी खूप विचार केला. पण काय सुचणार होतं त्या वयात? आम्ही आमच्या एका आवडत्या सरांना 'एखादे शिक्षक बदलून पाहिजे असतील तर काय करायचं असतं' असं विचारलं. त्यांना वाटलं आम्ही सहजचं विचारतोय.ते म्हणाले सगळ्यांनी मिळून मुख्याध्यापकांकडे जाऊन सांगायचं. झालं. आमच ठरलं. खूप दिवस न घालवता आम्ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत ऑफिसमध्ये गेलो. शिपायानं विचारल्यावर सांगितलं एका सरांविषयी तक्रार करायला आलो आहोत म्हणून. पाचवीतल्या चिमुरड्या तक्रार घेऊन आलेल्या पाहून त्या शिपायानं आम्हाला शेळ्या हुसकावून लावतात तसं तिथून हाकलून लावलं. तोपर्यंत आमचा मराठीच्या 'त्या' सरांकडे बघायचा दृष्टीकोनचं बदलून गेला होता. आता आम्हाला 'ते' सर आमचे एक नंबरचे शत्रू वाटू लागले होते. मग त्यांना हरप्रकारे त्रास कसा देता येईल याचा विचार सुरु झाला. मराठीचे धड्यातले, व्याकरणाचे खूप प्रश्न विचारणं, त्यांना अगदी वैताग येईल असे प्रश्न विचारणं, त्यांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडण्याचे प्रयत्न करणं, ते वर्गात येण्यापूर्वी त्यांच्या खुर्चीवर खाजवणारी काउसकुल्ली ठेवणं, खुर्चीच्या फटीत काटे ठेवणं ,त्यांना शिकवताना मध्ये-मध्ये त्रास देणं असे अनेक प्रकार सुरु केले. हे असं कित्येक दिवस सुरु होतं. आता या प्रकरणाचा शेवट काय झाला? जे आठवतंय त्यानुसार आमच्या आवडत्या सरांना आमची अडचण सांगितली, आणि त्यांनी आम्हाला चांगलंच खडसाऊन आमचं कसं चुकतंय ते सांगितलं. ते आम्हाला पटलं कि नाही हे महत्वाच नव्हतं, ते आमच्या आवडत्या सरांनी सांगितलं होतं ते महत्वाचं होतं. मग अभ्यासात आम्ही इतके बुडून गेलो कि 'त्या' सगळ्या गोष्टी हळूहळू डोक्यातून निघून गेल्या.

2 comments:

  1. ya postcha ek motha lekh hou shakato, as vaatat. Bagh kas kay te.

    ReplyDelete
  2. प्रयत्न करीन. कसं जमेल सांगता नाही यायचं. सूचनेसाठी धन्यवाद.

    ReplyDelete

About Me

My photo
short tempered,talkative.love to watch tv.